नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित असलेली तीन संग्रहालये लाल किल्ल्यात सुरू करण्यात आली असून, २३ जानेवारी २०१९ रोजी त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ही संग्रहालये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना, जालियनवाला बाग हत्याकांड आणि १८५७चे स्वातंत्र्यसमर या विषयांना वाहिलेली आहेत.
२३ जानेवारी या नेताजींच्या जयंतीचे औचित्य साधून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. नेताजींनी वापरलेली लाकडी खुर्ची, तलवार, मेडल्स, बॅजेस, गणवेश अशा नेताजींशी आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित अनेक वस्तू या संग्रहालयात आहेत. ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेवर चालवलेल्या खटल्यांची सुनावणी लाल किल्ल्यात घेण्यात आली होती. ही सेना देशविरोधी कारवाया करते, असे लोकांना भासवू देण्याचा ब्रिटिशांचा उद्देश त्यामागे होता; मात्र प्रत्यक्षात त्यांचा हेतू सफल झाला नाही.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेले ‘याद-ए-जालियान’ हे संग्रहालय जालियनवाला बाग हत्याकांडाच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. या हत्याकांडाला २०१९मध्ये १०० वर्षे होत आहेत. या हत्याकांडाचा इतिहास या संग्रहालयाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. तसेच भारतीय जवानांनी पहिल्या जागतिक महायुद्धात गाजविलेले शौर्य आणि केलेल्या त्यागाची माहितीही या संग्रहालयातून मिळणार आहे.
तिसरे संग्रहालय १८५७च्या स्वातंत्र्यसमराशी निगडित आहे. या युद्धात भारतीयांनी गाजविलेला पराक्रम आणि त्यागाची माहिती या संग्रहालयातून लोकांना मिळणार आहे.
संबंधित घटना किंवा काळाशी निगडित फोटो, चित्रे, वृत्तपत्रांची कात्रणे, पुरातन सार्वजनिक कागदपत्रे, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स, अॅनिमेशन आणि मल्टिमीडिया अशा विविध माध्यमांतून दर्शकांना इतिहासाची अनुभूती घेता येणार आहे.
(हेही जरूर वाचा : देशाच्या स्वातंत्र्यात आझाद हिंद सेनेचे योगदान महत्त्वाचे)